लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल
राज्यात ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक
मुंबई दि.१६- विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात ४८० गुन्हे दाखल झाले आहेत, २५८ जणांना अटक करण्यात आली असून कोरोना महामारीला जातीय व धार्मिक रंग देऊन टिकटॉकवर व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करणाऱ्याविरुद्ध बीडच्या परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४८० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ एनसी आहेत) नोंद १५ जूनपर्यंत झाली आहे. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल
■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – १९६ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २५ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५१ गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५८ आरोपींना अटक.
■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
सायबर भामट्यांपासून सावधान – महाराष्ट्र सायबरचे आवाहन
सध्याच्या काळात सायबर भामटे लोकांना फसविण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करीत असून त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.
मोबाईलवर एक एसएमएस या भामट्यांकडून पाठविला जातो, त्यात तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले असून मेसेज मधील नंबरवर कॉल करून तुमची माहिती अपडेट करा, किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करून तुमची माहिती अपडेट करा. तुम्ही माहिती दिलीत तर त्याची खात्री करण्यासाठी येणारा ओटीपी पण मागितला जातो व तुमच्या खात्यामधील पैसे अनोळखी अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातात . या सर्व संभाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे भामटे कधीही सर्व संभाषणात तुमच्या बँकेचे नाव घेत नाहीत . तुमचे कार्ड ब्लॉक केले आहे अशा स्वरूपाचे हे एसएमएस असतात.
अशा स्वरूपाच्या फसव्या एसएमएसपासून सावध राहा, त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा फोन करू नका असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. कुठलीही बँक कोणत्याही खातेदाराची वैयक्तिक माहिती जसे कि सीव्हीव्ही क्रमांक ,पिन क्रमांक फोनवर विचारणार नाहीत,तसेच ओटीपी कन्फर्म करण्यासाठी कॉल करणार नाहीत . जर तुम्हाला असा फोन आला व पलिकडील व्यक्ती त्या संभाषणामध्ये तुमच्या बँकेचे नाव घेत नसेल तर तो फेक कॉल असण्याची शक्यता जास्त आहे .तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा आणि www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.