सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा म्हणजे मुर्तीमंत तेज – पालकमंत्री सुभाष देसाई

  • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
  • महानगरपालिकेद्वारे संचलित पेट्रोलपंपाचे उद्घाटन

 औरंगाबाद,२८जून /प्रतिनिधी :- भारताच्या इतिहासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव आदराने घेतले  जाते, त्यांनी भारताला अखंड ठेवण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. शहरातील शहागंज भागात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा हा मुर्तीमंत तेज असून  हा पुतळा  आपल्या सर्वांना देशभक्तीची प्रेरणा देत राहिल असे उद्गार उद्योग व खनिकर्म, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काढले .

शहागंज चमन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती  पुतळयाचे अनावरण  श्री. देसाई यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सर्वश्री आमदार हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार कल्याण काळे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका आयुक्त अस्तिक  कुमार पाण्डेय यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर  1948  हे वर्ष मराठवाडयाचे स्वातंत्र्य वर्ष म्हणून ओळखले जाते तर 2023 पर्यंत औरंगाबाद शहर हे सुपर औरंगाबाद शहर म्हणून ओळखले जाईल. कारण 2023 मध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष पूर्ण होतील याचे औचित्य म्हणून 1680 कोटींची पाणी योजनेच्या माध्यमातून शहरवासियांचा पाणीप्रश्न सोडवण्यात येणार आहे. या योजनेद्वारे प्रत्येक घरात स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होईल. तसेच  शहराला आठवडयातून दोनदा पाणीपुरवठा केला  जाईल. श्री देसाई पुढे म्हणाले की, शहरात रस्ते सुधारणा, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, घनकचरा डेपो, सांडपाणी व्यवस्था, सफारी पार्क या सारख्या सर्व समस्या सर्वाच्या सहकार्यातून सोडविल्या जात आहेत. या माध्यमातून शहराची ओळख ही अव्वल दर्जाचे महानगर म्हणून होईल असा विश्वासही त्यांनी शहरवासियांना दिला.  कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरीता सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच प्रशासनाने वेळोवेळी लावलेल्या निर्बंधांचे काटकोरपणे पालन करावे, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निर्बंधांबाबतचे नियम पाळण्याचे कळकळीचे आवाहन श्री.देसाई यांनी यावेळी केले. तसेच नव्याने आलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधाकरिता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.

आ.अतुल सावे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे काम  प्रलंबित होते. परंतु माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ते खासदार असताना त्यांच्या खासदार निधीतून 40 लाख रुपयांचा निधी दिल्याने पुर्णाकृती पुतळयाचे काम पुर्णत्वास आले आहे.  

 मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांण्डेय प्रास्ताविकात म्हणाले की, 7 नोव्हेंबर 2009 च्या मनपाच्या अंदाजपत्रकात सरदर वल्लभभाई पटेल यांचा अर्धाकृती पुतळा काढून तेथे पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. त्या मंजुरीनंतर महानगर पालिकेतर्फे सरदार पटेल यांचा ब्राँझचा 9 फुट उंच पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.

माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, औरंगबाद शहराचा सर्वबाजूने  विकास होत आहे. सरदार पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळयाने शहराच्या सौंदर्याबरोबरच सरदार पटेल यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल. हैद्राबाद मुक्तीसंग्राम आंदोलनात गुजराती समाजाचेदेखील मोठे योगादान राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्वांतत्र्य सैनिक ताराबाई लढ्ढा यांचा सत्कार करण्यात आला.

Displaying पेट्रोलपंप उद्घाटन-1.JPG

महानगरपालिका संचलीत पेट्रोल पंपाचे उद्घाटन

बायजीपूरा येथील मध्यवर्ती जकात नाका येथे महानगरपालिका संचलीत पेट्रोल पंपाचे उद्घाटन श्री.देसाई यांच्या हस्ते दुचाकी वाहनात इंधन भरुन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

याप्रसंगी आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे आदींची उपस्थिती होती.