योगामुळे जगभरातील लोकांना कोविड महामारीचा सामना करण्याचा आत्मविश्वास आणि बळ मिळाले-पंतप्रधान

  • प्रत्येक देश, समाज आणि व्यक्तीच्या आरोग्यासाठी पंतप्रधानांनी केली प्रार्थना
  • पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांनी योगाला स्वतःचे कवच बनवले आणि आपल्या रूग्णांनाही मदत केली
  • विभक्तपणाकडून एकात्मतेकडे जाण्याचा प्रयास म्हणजे योग. हे अनुभवसिध्द शास्त्र असून अद्वैताची जाणीव म्हणजे योग: पंतप्रधान
  • वसुधैव कुटुंबकम’ हा मंत्र आज जगन्मान्य ठरला आहे- पंतप्रधान
  • योगाभ्यासाच्या ऑनलाईन वर्गामुळे मुलांना कोविडविरुद्धच्या लढाईत ताकद मिळते आहे: पंतप्रधान

नवी दिल्ली,२१जून /प्रतिनिधी :- जगभरात कोरोना महामारीचा प्रकोप असताना, यंदाची आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना “सर्वांच्या कल्याणासाठी योग” लोकांना आत्मबळ देणारी ठरली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी म्हटले आहे. जगातील प्रत्येक देश, समाज आणि व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आणि आपण सगळे एकत्र येऊन एकमेकांना बळ देऊ अशी प्रार्थना केली. सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त त्यांनी आज जनतेशी संवाद साधला.

Image

कोविड महामारीच्या काळात योगशास्त्राच्या योगदानाविषयी ते बोलले. या संकटकाळात योगशास्त्र सर्वांना ताकद आणि मानसिक शांती देण्यास उपयुक्त ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. योगशास्त्र इतर देशांच्या संस्कृती-आचारविचारांचा भाग नाही, त्यामुळे कोविडच्या काळात या देशांना योगदिनाचे विस्मरण होणे स्वाभाविक होते, मात्र तसे झाले नाही, उलट योगाविषयीचा उत्साह जगभर वाढल्याचे सिध्द झाले आहे. कारण जगभरात, महामारीशी लढा देण्यासाठी योगाने लोकांचा आत्मविश्वास आणि बळ वाढवण्यात मदत केली आहे. कोरोना लढाईतल्या पहिल्या फळीतील योद्ध्यांनी कसे योगाला आपले कवच बनवले आणि स्वतःला योगाभ्यासतून अधिक सुरूढ बनवले याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्वसामान्यांनीही योगाचा उपयोग केला. आता विशेषज्ञ देखील प्राणायाम आणि अनुलोम-विलोमसारखे श्वसनाचे व्यायाम आपली श्वसन यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
 

महान तामिळ संत तिरुवल्लवूर यांचे वाचन उद्धृत करत, पंतप्रधान म्हणाले की योग कुठल्याही आजाराच्या मूळाशी जातो आणि त्याचे कारण शोधून शरीर संपूर्ण बरे करण्यासाठी मदत करते. जागतिक स्तरावर  योगाभ्यासाच्या आजार बरे करण्याच्या गुणवैशिष्ट्यांवर अध्ययन आणि संशोधन सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. योगामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याविषयीचे अध्ययन आणि मुले ऑनलाईन योगाभ्यास करत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या वर्गांमुळे मुलांमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठीची ताकद वाढते आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
 


पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, योगाच्या सर्वांगीण स्वरूपावर भर देत सांगितले की योगशास्त्र व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर भर देते. योग आपल्याला आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव करुन देते आणि सगळ्या नकारात्मकतेपासून आपले संरक्षण करते. योगाच्या सकारात्मकतेवर भर देतांना पंतप्रधान म्हणाले “विभक्तवादापासून, एकेकटेपणापासून एकत्वाकडे, संयोगाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे योग. हे एक अनुभवसिध्द शास्त्र असून, योग आपल्याला एकत्वाची, अद्वैताची जाणीव करून देते.” याच संदर्भात त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे विचार मांडत सांगितले की, “ ‘स्व’ची जाणीव आपल्याला देव किंवा इतरांपासून विभक्त होऊन होऊ शकत नाही, तर योग म्हणजेच एकत्रित येणे, ही एक निरंतर होत राहणारी जाणीव आहे.”

वसुधैव कुटुंबकम हा मंत्र भारतात कित्येक वर्षांपासून मनाला आणि अंगिकारला जातो आहे, आता हा मंत्र संपूर्ण जगानेही स्वीकारला आहे. आज आपण सगळे एकमेकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो आहोत. मानवतेवर जेव्हाही काही संकट आले, त्यावेळी योगशास्त्राने आपल्याला सर्वांगीण निरामयतेचा मार्ग दाखवला आहे. “योग आपल्याला आनंदी जीवनाचा मार्गही सांगतो. यापुढेही, योग, सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याबाबत सकारात्मक योगदान देत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम पुढेही करतच राहील, असा मला विश्वास वाटतो, असे पंतप्रधान म्हणाले. 

भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्याने आज या क्षेत्रात आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली.  जगाला आज M-Yoga एपची भेट मिळत असून, यावर, योगाविषयीच्या मूलभूत नियमांचे पालन करत योगप्रशिक्षकांचे योगाभ्यासाचे विविध भाषांमधील व्हिडीओ यावर बघता येतील.

हे एप म्हणजे प्राचीन विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानच्या संयोगाचे अद्भूत उदाहरण असून, त्या माध्यमातून जगभर योगाचा प्रचार आणि प्रसार होऊन, ‘एक जग, एक आरोग्य’ हे ध्येय साध्य होऊ शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
 


भगवद्गीएतील श्लोक उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले की योगामध्ये आपल्या प्रत्येक समस्येवरील उत्तर आहे, त्यामुळे मानवजातीच्या कल्याणासाठी आपण योगाचा हा एकत्रित प्रवास असाच सुरु ठेवायला हवा. योगशास्त्राची मूलभूत तत्वे आणि गाभा तसाच कायम ठेवत, ते जगभरातील सर्वसामान्यांपर्यंत पोचवले पाहिजे. योगाचार्य आणि इतरांनी योगशास्त्र प्रत्येकापर्यंत पोचवण्याच्या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.