वर्ष 2024 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू 50% पर्यंत कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट-रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली ,१७ जून /प्रतिनिधी :-रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले की, वर्ष 2024 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू 50% पर्यंत कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
फिक्कीच्या वतीने आयोजित ‘रस्ते अपघातांमधील जीवीतहानी कमी करण्यासाठी कॉर्पोरेट्सची भूमिका’ या विषयावरील आभासी सत्राला संबोधित करताना श्री गडकरी यांनी , उद्योग जगतासाठी सुरक्षित व्यवस्थेच्या दृष्टिकोनावर आधारित रस्ते सुरक्षा साहाय्य संघटना ‘ सफर’ आणि रस्ता सुरक्षिततेविषयी श्वेतपत्रिका जाहीर करण्याच्या घोषणेबद्दल फिक्कीचे अभिनंदन केले. प्रत्येक राज्यात, जिल्हा आणि शहरात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजेच अपघात प्रवण क्षेत्र ओळखण्याच्या गरजेवर मंत्र्यांनी भर दिला.मंत्री म्हणाले की, जागतिक बँक आणि आशियायी विकास बँकेने यापूर्वीच राज्य सरकार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि अन्य भागधारकांना ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी 14,000 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे.
मंत्री म्हणाले की, त्यांचे मंत्रालय रस्ते सुरक्षेसाठी चार ‘ई’, म्हणजेच (इंजिनियरिंग )अभियांत्रिकी (रस्ते व वाहन अभियांत्रिकीसह), ( इकॉनॉमी )अर्थव्यवस्था,
(एन्फोर्समेंट) अंमलबजावणी आणि (एजुकेशन ) शिक्षण यांची पुनर्रचना आणि बळकटीकरण करून रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अपघात होण्यामागील कारणे शोधण्यासाठी कॉर्पोरेट जगताने स्वतंत्र सर्वेक्षण करावे आणि मंत्रालयाला अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी केली.रस्ते अभियांत्रिकीच्या समस्येमुळे 50%रस्ते अपघात होत असल्याचे मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले आणि आता ब्लॅक स्पॉट सुधारण्यासाठी सरकारने विशेष उपक्रम हाती घेतले असून हे उपक्रम भारतातील ‘शून्य रस्ते अपघात’ या दृष्टिकोनासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देतील. .
श्री गडकरी म्हणाले की, शिक्षण आणि जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, विद्यापीठे यांचे सहकार्य आवश्यक आहे.सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र रस्ता सुरक्षा परिषद 15 दिवसांच्या आत अस्तित्वात येईल, अशी घोषणा मंत्र्यांनी केली.