भूजल पुनर्भरण, व्यवस्थापन काळाची गरज -सहसंचालक डॉ.साळवे
भूजल व आम्ही’ विषयावर ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन
औरंगाबाद,,५ जून /प्रतिनिधी:- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या वतीने यंदा सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त भूजल पातळी वाढविण्यासाठी जिल्हाभरात लोकसहभागातून भूजल पुनर्भरण अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण होऊन भूजल पातळीत वाढ होईल, असे प्रतिपादन सहसंचालक डॉ पी. एल. साळवे यांनी केले. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘भूजल व आम्ही’ विषयावरील ऑनलाईन वेबिनार प्रसंगी बोलत होते.
या वेळी उप संचालक बी. एस. मेश्राम, मुख्य खोदन अभियंता हनुमंत ढोकळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक पी. एम शेलार, वरिष्ठ खोदन अभियंता मनोज सुरडकर दूरस्थ माध्यमातून (Online) उपस्थित होते.
सहसंचालक साळवे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्जन्यमान देखील आपल्या हातात नाही. पाऊस कधी पडेल याची शाश्वती नाही. सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी भूगर्भात कसे जिरविता येईल, याकडे सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनांकडून पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम राबविला जात आहे. पाणलोट क्षेत्रातील पाणी त्याच क्षेत्रात मुरविणे गरजेचे आहे. डोंगर माथ्यावरुन पाणी वाहून गेल्यास पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे पाणी टंचाईचे महत्त्व नागरिकांना कळले पाहिजे, तरच पाण्याची किंमत कळणार आहे. त्यामुळे भूजल पुनर्भरण आणि व्यवस्थापन काळाची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली.
औरंगाबाद विभागाचे विभागीय उप संचालक बी एस. मेश्राम म्हणाले, सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या विभागाचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्रत्येक जिल्ह्यात यंदा अभियान लोकसभागातून राबविण्यात येत येणार आहे. त्यांनी भूजल पुनर्भरणाची चळवळही व्यापक प्रमाणात राबविण्याचे आवाहन केले. याकरिता आवश्यक असणारे सर्व तांत्रिक सहाय्यक तज्ज्ञ व्यक्ती मार्फत तर्फे दिले जाणार आहे. या अंतर्गत विहीर पुनर्भरण, विंधन विहिर पुनर्भरण, रिचार्ज शाफ्टद्वारे भूजलाचे पुनर्भरण असे विविध कार्यक्रम नागरिकांनी हाती घ्यावयाचे आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा द्वारे भूजलाच्या उपलब्धतेबाबत अभ्यास केला जातो त्याच बरोबर भूजलाच्या पाण्याची पातळीची माहिती घेणे, भूजलाची गुणवत्ता या बाबी तपासणी करणे इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जातो.
वरिष्ठ भू वैज्ञानिक पी. एम शेलार यांनीही मार्गदर्शन केले, येत्या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तसेच सुजाण नागरिकांनी आपल्या शेतातील विहिरीचे पुनर्भरण तसेच घरातील विंधन विहिरीचे पुनर्भरण, छतावरील पावसाचे द्वारे व जवळच्या नदी नाले ओढेद्वारे करावे व यंत्रणेकडे असणाऱ्या तांत्रिक माहितीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पुणे येथील मुख्य खोदन अभियंता हनुमंत ढोकळे यांनी सायफन पद्धतीने पाण्याचे पुनर्भरण, वरिष्ठ खोदन अभियंता मनोज सुरडकर यांनी विहिरी पुनर्भरण, डॉ. शरद गायकवाड यांनी पाण्याचा ताळेबंद, डॉ. कैलास आहेर यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पाऊसपाणी आणि संजय पाटील यांनी भूजलाची गुणवत्ता याबद्दल ऑनलाईन पीपीटीच्या माध्यमातून माहिती दिली.
भूजल पुनर्भरण लोकचळवळ होण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चे अधिकारी आणि कर्मचारी यासाठी प्रयन्त करत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली खोबरे यांनी केले.
या एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेसाठी उपसंचालक दिवाकर धोटे, उपअभियंता व्ही एम. सगदेव, उपअभियंता बी. डी. पाटील, श्री.श्रीखंडे, डॉ.वंजारवाडकर, प्रा. श्री. तेरकर, मनिषराज जैस्वाल, गिरीश महाजन, सुनील महाजन, विकास सोनवणे, संजय पाटील, प्रफुल शिंदे, निलेश जाधव, योगेश वागदे, इर्शाद शेख, जाहीर खान, श्री. जाधव, श्री. गोंडपाटील, श्री ढवळे, कृष्णा देशपांडे, अमित भातपुडे, रवींद्र मांजरामकर, रवी पवार, अमित जिरंगे, रोहन पवार, प्रा. पाथ्रीकर, गणेश इंगळे, दादासाहेब मगर, योगेश बोर्डे, रुपेश आहेर, प्रा. दीपक बोरनारे, जलप्रेमी, जलयोद्धा, जलदूत , जलसुरक्षक आदींसह विविध विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, गावकरी, विविध सेवाभावी संस्थांचे अधिकारी, कर्मचारी दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते.