सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द,राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द होणार ?

इयत्ता बारावीचे निकाल दिलेल्या वेळेत वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे देणार

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय : पंतप्रधान


विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आणि त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही : पंतप्रधान

नवी दिल्ली,१ जून /प्रतिनिधी:- 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या वर्गांच्या परीक्षांसंबंधीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक झाली. याविषयाबाबत झालेल्या सविस्तर चर्चा तसेच राज्य सरकारे आणि आणि इतर संबंधितांची  मत मतांतरे याबद्दल एक दृक्श्राव्य सादरीकरण यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता राज्यातील परीक्षाची रद्द होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. दहावी प्रमाणे बारावीची परीक्षा न घेण्याची राज्य सरकारची आधीपासूनच मानसिकता आहे. याबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेकडे राज्य सरकारचे लक्ष होते.

कोविडमुळे निर्माण झालेली अनिश्चित परिस्थिती लक्षात घेऊन आणि त्याबद्दल विविध संबंधितांकडून आलेले अभिप्राय यांच्या आधारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा यावर्षी होणार नाहीत असा निर्णय घेण्यात  आला आहे.सरकारच्या या निर्णयामुळे सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षेला बसणार्‍या सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिलेल्या वेळेत वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल देण्यासाठी पावले उचलेल असाही निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांसंबंधीचा निर्णय घेतला गेला आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. कोविड-19मुळे शैक्षणिक वेळापत्रकावर चांगलाच परिणाम झाला. त्यामुळेच बोर्डाच्या परीक्षांसंबंधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता होती त्याला आता पूर्णविराम देणे आवश्यक होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

कोविड संबंधी देशभरात वेगवेगळी परिस्थिती आहे. देशातील कोविड रुग्ण संख्या कमी होत आहे त्याच वेळी काही राज्ये लघु विलगीकरण विभागांद्वारे परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत, काही राज्यांमध्ये अजूनही  टाळेबंदी आहे.  अशा वातावरणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांनाच काळजी वाटणे स्वाभाविक आहे. या तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी सक्ती करणे योग्य नाही असेही पंतप्रधान म्हणाले.

आपल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा सर्वात महत्वाचे आहे यावर भर देत त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे पंतप्रधान म्हणाले. आत्ताच्या परिस्थितीत  तरुणांचे आयुष्य पणाला लावण्यासाठी  परीक्षा कारणीभूत  ठरू नये, असे त्यांनी सांगितले

सर्व संबंधितांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे असे सांगून पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना बारावीचे निकाल हे  वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे योग्य पद्धतीने आणि वेळेचे बंधन पाळून लावले जावेत अशा सूचना दिल्या.

याबाबतीत सविस्तर चर्चा झाल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी विद्यार्थी-केंद्रित निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यासाठी देशाच्या विविध भागातून सर्व संबंधितांशी सल्लामसलत केली गेली, असेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयांवर आपले अभिप्राय दिल्याबद्दल त्यांनी राज्यांचेही आभार मानले.

गेल्यावर्षी सारखेच काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा असेल तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर त्यांना हा पर्याय देण्यात येईल.

पंतप्रधानांनी या आधी दि 21/05/21 रोजी  उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्याला मंत्री तसेच अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर 23.05.2021 रोजी संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली . त्यामध्ये विविध  राज्यांच्या  शिक्षणमंत्र्यांनी भाग घेतला.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे  पर्याय आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या अभिप्रायांवर यावेळी चर्चा करण्यात आली होती.

आजच्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री अर्थमंत्री, वाणिज्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, स्त्रिया व बालविकास मंत्री, पंतप्रधानांचे  मुख्य सचिव, मंत्रिमंडळ सचिव आणि शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षण विभागाचे सचिव व इतर अधिकाऱी उपस्थित होते.

बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी दिले प्रधानमंत्र्यांना धन्यवाद
बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी दिले प्रधानमंत्र्यांना धन्यवाद

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत.

परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून 12 वी तसेच अशा काही महत्त्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती. कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दहावी व बारावीसारख्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही होत होती. मुख्यमंत्र्यांनीदेखील यासंदर्भात आपले म्हणणे मांडले होते.  राज्यातही दहावीच्या परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच  घेतला आहे.