मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील-खा. संभाजी राजे यांचा इशारा
नांदेड ,२५ मे /प्रतिनिधी :- मराठा समाजाला न्यायालयाने दिलेले आरक्षण रद्द झाल्याने सत्ताधारी व विरोधकांनी समाजाचा अंत न पाहता हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी अपेक्षा खा. संभाजी राजे भोसले यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. याप्रकरणात सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. आपण स्वतः 27 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व 28 मे रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाने समन्वय राखून हा प्रश्न निकाली काढावा. समाजातल्या गोरगरीबांना गेल्या दोन वर्षांपासून त्याची प्रतिक्षा आहे. विविध पदांसाठी झालेली नोकरभर्ती त्यात मराठा आरक्षणानुसार निवड झालेले उमेदवार अद्याप वेटिंगवर आहेत. त्यांचा प्रश्न मार्गी लावावा असे भोसले यांनी स्पष्ट केले.