रुग्णांना म्युकर मायकोसिस आजाराचा उपचार संपुर्णत: मोफत -सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

म्युकर मायकोसिस आजारावर उपचारासाठी जालन्यातील तीन खासगी दवाखान्यांचा समावेश

जालना,२४ मे /प्रतिनिधी:- म्युकर मायकोसिस आजाराचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन या योजनेंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचे उपचार तसेच त्यावरील लागणारी रक्कमही शासनामार्फत भरण्यात येणार असल्यामुळे रुग्णांना म्युकर मायकोसिस आजाराचा उपचार संपुर्णत: मोफत मिळणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली.

Black fungus (COVID-19 condition) - Wikipedia

जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा दर वाढत असुन वाढता संसर्ग रोखण्यासाठी आयसीएमआरच्या सुचनेनुसार हायरिस्क व लोरिस्क सहवासितांचा अचुक शोध घेऊन त्यांच्या स्वॅबची चाचणी करण्याबरोबरच जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणामध्ये राहणार नाही, याची खबरदारी घेत संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने आज दि. 24 मे रोजी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी श्री कोरडे, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप, अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा दर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्युही होत आहे. जिल्ह्यात वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी कोरानाबाधितांच्या सहवासितांचा अचुक शोध घेऊन हायरिस्क असणाऱ्या सहवासितांची आरटीपीसीआर तर लोरिस्क सहवासितांची अँटीजेन चाचणी करण्यात यावी. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्के तर अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण 30 टक्के राहील याचीही दक्षता घेण्यात यावी. ग्रामीण भागामध्ये बाधित असलेले व्यक्ती कोव्हीड केअर सेंटरमध्ये येण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे गावस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीने अशा रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. यासाठी आवश्यक असणारी वाहने तसेच मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

म्युकर मायकोसिसवरील आजार मोफत

म्युकर मायकोसिस आजाराचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन या योजनेंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचे उपचार तसेच त्यावरील लागणारी रक्कमही शासनामार्फत भरण्यात येणार असल्यामुळे रुग्णांना म्युकर मायकोसिस आजाराचा उपचार संपुर्णत: मोफत मिळणार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी जालना जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद हॉस्पीटल, जालना हॉस्पीटल, दीपक हॉस्पीटल तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असुन याबाबतचे फ्लेक्स रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्याबरोबरच या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबतही जनमानसामध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणुन घेऊन त्यांना उपचाराच्यासंदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करण्याबरोबरच ज्यांना त्रास असेल अश्यांना तातडीने कोविड केअर सेन्टरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश देत कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉकटेस्ट घेण्यात यावी, अशा सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने निर्बंधामध्ये 1 जून पर्यंत वाढ केली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनाना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी 11-00 वाजेनंतर मेडीकल व अत्यावश्यक सेवेतील सुट देण्यात आलेली दुकाने वगळता कुठलेही दुकान सुरु राहिल्यास अशी दुकाने सील करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.