सिल्लोड तालुक्यातील जलसिंचन बळकटीकरणासाठीची कार्यवाही तातडीने करावी- राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद ,२० मे / प्रतिनिधी :- सिल्लोड तालुक्यासह आसापासच्या सर्व गावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होण्यासोबत जलसिंचन बळकटीकरणासाठीची आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश आज महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिन विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले.
सिंचन भवन येथे आयोजित सिल्लोड तालुक्यातील जलसिंचन आढावा बैठकीत राज्यमंत्री श्री. सत्तार बोलत होते. या बैठकीस के. बी. कुलकर्णी, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद, डी.बी. तवार, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग औंगाबाद, मनोज अवलगावकर,अधीक्षक अभियंता, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औंगाबाद, यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री श्री.सत्तार म्हणाले, सिल्लोड तालुक्याच्या क्षेत्रफळानुसार हक्काचे पाणी तालुक्यास मिळालेच पाहिजे त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातुन तालुक्याला आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासाठीची कार्यवाही कालमर्यादेत पूर्ण करावी. जेणेकरुन येत्या पावसाळ्यातील पाण्याचा योग्य साठा होईल असे निर्देशित करुन श्री.सत्तार यांनी सिल्लोडची भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना दिलासादायक सिंचन व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असून त्या दृष्टीने सिल्लोड-सोयगाव परिसरातील क्षेत्राचे सर्वेक्षण करुन तातडीने संबंधितांनी पर्यायी पाणीसाठ्याबाबतचे प्रकल्प अहवाल सादर करावेत. ज्याच्या माध्यमातून शासनाकडे तालुक्यासाठीच्या पर्यायी पाणीसाठ्याची मागणी करता येईल. त्याचप्रमाणे मान्यता मिळालेल्या मात्र काम सुरू न झालेल्या, मान्यता रद्द झालेल्या इतर धरण, प्रकल्पातील तसेच इतर पाणीसाठ्यांमधील पाणी सिल्लोडच्या जलसिंचनासाठी वापरता येईल या दृष्टीने माहिती संकलन करुन त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करावा, खेळना प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.
तसेच सोयगाव-सिल्लोड क्षेत्रातील मध्यम प्रकल्पाच्या धरण, पाणी साठ्याच्या जमिनीची मोजणी करुन सिमा निश्चिती करुन घ्याव्यात. ज्या ठिकाणी या जागेत अतिक्रमण केलेले असेल ते तातडीने हटवून संबंधित यंत्रणांनी ती जागा ताब्यात घ्यावी. तसेच खेळना, अंजिंठा, सोयगाव, केळगाव यासह इतर प्रकल्पातील सर्व गाळ काढून शेतकऱ्यांना तो वाटून द्यावा. जेणे करुन जमिनीची सुपिकतेत त्याचसोबत धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. सर्व यंत्रणांनी शेतकऱ्यांना मध्यवर्ती ठेवून जलसिंचनाची पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य देत आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.