चारित्र्यांवर संशय घेवून पत्नीचा गळा दाबून खून,पतीला जन्मठेप
औरंगाबाद,२० मे /प्रतिनिधी
चारित्र्यांवर संशय घेवून पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या नराधम पती रामदास केरुबा साळवे (४६, रा. राजीव नगर झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन) याला जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. देशपांडे यांनी गुरुवारी दि.२० दिले. विशेष म्हणजे मृताच्या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या पुर्नवसनाबाबत निर्णय घेण्यासाठी व नुकसान भरपाई बाबत प्रकरण जिल्हा विधी प्राधीकरणाकडे पाठविण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणात मृत ज्योती (२५) यांची बहिण आशाबाई दिलीप धनराज (३०) यांनी फिर्याद दिली होती. घटनेच्या तीन वर्षांपूर्वी ज्योतीचे लग्न आरोपी रामदास साळवे याच्याशी झाले होते. रामदास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करीत होता. घटनेच्या ५ महिन्यापूर्वी रामदास त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी अश्विनी (१२) हिला सोबत घेऊन रेल्वे स्थानकालगतच्या राजीवनगर झोपडपट्टी येथे राहण्यास गेला होता. तर ज्योती तिचा मुलगा आदित्य (दीड वर्ष) याच्यासोबत अब्रार कॉलनी येथे राहत होती .
१५ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी रामदास त्याची पत्नी ज्योती हिला घेऊन राजीवनगर येथे गेला होता. त्याच दिवशी सायंकाळी रामदास ज्योतीचा भाऊ सुनील जगताप यांच्या घरी गेला होता. ज्योती लघवीचा बहाणाकरून निघून गेली आहे. तुमच्याकडे आली का अशी चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशी सासू सासऱ्याच्या घरून रामदास मुलगा आदित्य याला घेऊन गेला होता. त्यानंतर बहीण भावंडांनी शोध घेतला असता राजीवनगर येथील रामदासाच्या खोलीत ज्योती बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेली व तिच्या नाका तोंडातून रक्त आलेले आणि तिचा गळा दाबल्याच्या खुणा दिसल्या होत्या. पोलिसांनी ज्योतीला घाटी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
त्यानंतर ज्योतीची बहीण आशाबाई दिलीप धनराज यांच्या फिर्यादीवरून रामदासविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए.बी. आव्हाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते .
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी ज्योतीचा भाऊ सुनील जगताप आणि डॉक्टर यांचे जबाब महत्वाचे ठरले. सुनावनीअंती न्यायालयाने आरोपी रामदासला जन्मठेप आणि तीन हजारांचा दंड ठोठावला. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम तायडे यांनी सहकार्य केले.