तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ४० घरांचे नुकसान; वैभववाडी तालुक्यास सर्वाधिक फटका

पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल

सिंधुदुर्गनगरी/पालघर, १६मे /प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण 27 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून 2 शांळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही पडला आहे.

इतर तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. दोडामार्ग तालुक्यात 8 झाडे पडली आहेत. सावंतवाडी तालुक्यात 6 ठिकाणी झाडे पडली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे. तर पाच झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात 2 घरांचे नुकसान झाले असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. तर 4 ठिकाणी झाडे पडली आहेत. तसेच एका ठिकाणी विद्युत पोलही पडला आहे. मालवण तालुक्यात 2 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका पत्र्याच्या शेडचे नुकसान व एक विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात 9 घरांचे, एका गोठ्याचे, एका शाळेचे नुकसान झाले आहे. तीन ठिकाणी झाडे पडली आहेत. देवगड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले असून 2 ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे.

५१२ नौका समुद्रकिनारी

पालघर : जिल्ह्यातील मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५१२ नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरीकांसाठी अलर्ट जारी केला होता. मच्छीमार आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी परत आल्या आहेत.