महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना “तौ ते” चक्रीवादळाचा धोका,काही तासात धडकणार चक्रीवादळ, गृहमंत्रालयाकडून इशारा

“तौ ते” या  चक्रीवादळाचे पुढील 6 तासात तीव्र चक्रीवादळात आणि त्यापुढील 12 तासात अतिजास्त तीव्रतेच्या चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता
18 मे रोजी दुपारी/ संध्याकाळी पोरबंदर आणि नलिया दरम्यान गुजरातची किनारपट्टी ओलांडण्याची दाट शक्यता

  नवी दिल्ली ,१५ मे /प्रतिनिधी :- “ तौ ते ” हे चक्रीवादळ अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून उत्तर- वायव्य दिशेला सरकत असून गेल्या सहा तासात ताशी 11 किमी वेगाने त्याची वाटचाल झाली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज 15 मे 2021 रोजी सकाळी  8.30 वाजता त्याचे स्थान 12.8° उत्तर अक्षांश आणि 72.5°पूर्व रेखांशाजवळ होते. हे ठिकाण अमीनदीवी बेटापासून सुमारे 190 किमी उत्तर-वायव्य, पणजीच्या दक्षिण-नैऋत्येला 330 किमी आणि गुजरातमधील वेरावळपासून 930 किमी तसेच पाकिस्तानमधील कराची पासून 1020 किमीवर होते. पुढील सहा तासात या चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची आणि त्यापुढील 12 तासात अतिजास्त तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. ते उत्तर- वायव्य दिशेला सरकण्याची खूपच जास्त शक्यता असून 18 मे रोजी ते दुपारी किंवा संध्याकाळी गुजरातमध्ये पोरबंदर आणि नलियादरम्यानची  किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

इशारा

(i) पाऊस:

कोकण आणि गोवाः 15 मे रोजी दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आणि 16 मे रोजी कोकण आणि गोवा आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आणि 17 मे रोजी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

(ii) वाऱ्याचा इशारा : 15 मे रोजी दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि त्यांचा वेग 60 ते 70 किमीपर्यंत वाढण्याची आणि 16 मे रोजी 60 ते 70 किमी वेगाने आणि त्यानंतर त्यापेक्षा जास्त 80 किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे

(iii) समुद्राची स्थिती : 15 आणि 16 मे रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील.

(iv) मच्छिमारांना इशारा : या काळात महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक आणि लगतच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात येत आहे. जे मच्छिमार उत्तर अरबी समुद्रात आहेत त्यांना परत फिरण्याची सूचना करण्यात येत आहे.

(v) हानीची शक्यताः गुजरातमध्ये देवभूमी, द्वारका, कच्छ, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ आणि जामनगर जिल्ह्यात हानी होण्याची शक्यता आहे. कच्च्या आणि मातीच्या घरांना धोका असून जोरदार वाऱ्याने घरांची छपरं उडून आणि हवेतून येणाऱ्या इतर वस्तूंमुळे हानीची भीती आहे. वीजेचे खांब आणि वाहिन्यांना देखील धोका आहे. रेल्वेमार्गांना देखील किरकोळ धोका संभवतो. मिठागरे आणि तयार पिके तसेच झुडुपांची हानी होण्याची आणि झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे.

(vii) उपाययोजना: मासेमारी पूर्ण थांबवावी, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे तर्कसंगत नियमन करावे. वादळाचा धोका असलेल्या भागातील लोकांनी घराबाहेर पडू नये. जलवाहतूक करू नये.