पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे लोकशाहीवरील संकट – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात भाजपातर्फे प. बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने

मुंबई, 5 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर राज्य सरकारच्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. या घटनांमुळे लोकशाहीवरच संकट आले आहे. मात्र या हिंसाचाराबाबत विचारवंत ,पत्रकार मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ नागपूर येथे झालेल्या निदर्शनात सहभागी होताना फडणवीस बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.

        फडणवीस म्हणाले की, या प्रसंगात देशभरातील भाजपा कार्यकर्ते पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. न्यायालये या हिंसाचाराची नक्कीच दखल घेतील, असा मला विश्वास आहे.

        भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे निदर्शनांत सहभाग घेतला. पाटील यांनी यावेळी सांगितले की, निकाल जाहीर झाल्यानंतर फक्त पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार झाला आहे. विजयाचा उन्माद चढलेले तृणमूल चे कार्यकर्ते भाजपा कार्यकर्त्यांना व भाजपाला मते देणाऱ्या मतदारांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत.तृणमूलच्या हिंसाचारात तेथील भाजप कार्यकर्त्यांच्या मालमत्तांचे नुकसान झाले असले, तरी त्यांना देशभरातून मदत करून पुन्हा नव्या उमेदीने उभे करण्याची भाजपची हिंमत आहे. 

        पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्रात भाजपा तर्फे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, खा.डॉ. विनय सहस्रबुद्धे, राष्ट्रीय सचिव विजयांताई रहाटकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशीष शेलार, बबनराव लोणीकर, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. गिरीश बापट,  खा. डॉ. भारतीताई पवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा आदींनी तसेच अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला.  कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून ही निदर्शने करण्यात आली.