आजपासून औरंगाबादेत हेल्मेट सक्ती नाही,१६ मे पासून होणार अंमलबजावणी
औरंगाबाद ,४ मे /प्रतिनिधी
औरंगाबाद पोलिस प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी या संबंधीचे पत्रक काढले होते.शहरात बुधवार दिनांक ५ मे पासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाने घेतला होता . पण या निर्णयाची अंमलबजावणी १६ मे पासून करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने मंगळवारी घोषित केले. ५ मे ही प्रिंटिंग चूक असल्याचा खुलासा सहाय्यक पोलीस आयुक्त वानखेडे यांनी केला आहे.
कोरोनाविरुद्धची लढाई चालू आहे तर सर्वांनी मास्क वापरावे असेहि आवाहन त्यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात तरुण-तरुणी विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसतात. मास्क, हेल्मेट नसलेले लोक ट्रिपल सीट, काही वेळा चार-चार लोक बाइकवर फिरतात असे मत व्यक्त करुन औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दुचाकी चालविणारे आणि मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती करा असे आदेश पोलिस प्रशासनाला दिले होते. कोविड महामारीच्या काळात अशी सक्ती केली तरच या विषाणूचा प्रसार होणार नाही असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते.