शेतकऱ्यांना 637 कोटी 79 लाख 99 हजार रुपयांची विमा नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा

बीड,दि. १० :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये जिल्ह्यात दि भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांचे मार्फत अधिसूचित पिकाची आजपर्यंत 13 लाख 72 हजार 931 अर्जदार शेतकऱ्यांना 637 कोटी 79 लाख 99 हजार रुपयांची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे.

विमा कंपनीकडून यामध्ये शेतकऱ्यांचे 21लाख 62 हजार अर्ज 7.64 लाख हेक्टर क्षेत्रासाठी प्राप्त असून 74 कोटी 22 लाख 54 रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला होता. याशिवाय केंद्र सरकारने रु.332 कोटी 94 लक्ष व राज्य सरकारने रु.332 कोटी 94 लक्ष विमा हफ्ता विमा कंपनी कडे जमा केला असून एकुन रक्कम रु.740 कोटी 11 लक्ष इतका विमा हफ्ता विमा कंपनीकडे जमा झालेला आहे. तूर पिकासाठी आष्टी तालुक्यातील धामणगाव , कडा , पिंपळा व धानोरा या 4 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे विमा नुकसान भरपाई चे प्रक्रियेत आहेत तसेच कांदा पिकासाठी अधिसूचित असलेल्या 9 तालुक्यातील विमा नुकसान भरपाई देण्याचे प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती विमा कंपनीकडून प्रशासनास दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांची अधिसूचित पिकाची पिक विमा नुकसान भरपाई अद्यापही बँक खात्यावर जमा झालेली नसेल अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

खरिपातील अधिसूचित पिकाची नुकसान भरपाई शासन निर्णयानुसार पीक कापणी प्रयोगाच्या उपलब्ध झालेल्या उत्पादनाच्या सरासरी आकडेवारीनुसार निश्चित करून विमा लागू झालेल्या अधिसुचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

विमा मंजूर असलेल्या महसूल मंडळ निहाय अधिसूचित पिकांसाठी मंजूर विमा तपशील प्रसिद्धीस देण्यात आला आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *