कोरोनाचा कहर : १५ दिवसांत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

लातूर,२६एप्रिल /प्रतिनिधी 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा जसा वाढतो आहे, त्यापेक्षा अधिक झपाट्याने मृत्युंचा आकडा वाढू लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट अतिगंभीर होत असतानाच गेल्या १५ दिवसांत एका पाठोपाठ एक असे एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यु झाल्याची घटना, मुरुड शहरात घडली. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मुरुड येथील नाडे कुटुंबात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर दि. १० एप्रिल रोजी दत्तोबा किसना नाडे (७५) यांचे निधन झाले. त्या पाठोपाठ प्रकाश दत्तोबा नाडे (५६) यांचा मृत्यू झाला. चार दिवसांनी त्यांच्या पाठोपाठ दि.१९ एप्रिल रोजी अच्युत दत्तोबा नाडे (५२) यांचा आणि २१ एप्रिल रोजी राजाबाई दत्तोबा नाडे (७२) यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. या कुटुंबातील संजय दत्तोबा नाडे हे देखील कोरोना संक्रमित होते, परंतु त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करीत, ते घरी परतले. एवढ्या मोठ्या दु:खद घटनेमुळे समस्त मुरुडकरांवर शोककळा पसरली आहे.