शेताच बांधावरुन खून; आरोपींच्या कोठडीत बुधवारपर्यंत वाढ
औरंगाबाद:
शेतीच्या बांधावरुन चुलत भावाचा कुऱ्हाडीने खून करणाऱ्या चुलत्यासह दोघा चुलतभावांच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत (दि. 10) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी मंगळवारी (दि. 9) दिले.
लक्ष्मण नागोजी वाघ (58), उद्धव लक्ष्मण वाघ (32) व अंकुश लक्ष्मण वाघ (28, सर्व रा. चिंचोली ता.जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात मयत कृष्णा रामराव वाघ (37) यांचा भाउ बाबासाहेब रामराव वाघ (33, रा. परदरी रोड चिंचोली) याने तक्रार दिली. बाबासाहेब वाघयांच्या कुटूंबीयांची गावात 14 एकर शेती आहे. त्यापैकी शेत गट नं 25,52 मध्ये शेताच्या बाधावरुन वाद आहे. घटनेच्या 15 दिवसांपूर्वी गट नं 52 मध्ये बाबासाहेब व कृष्णा असे दोघे जमीनीवरील नदीकाठच्या बोरीच्या काट्या काढत असतांना तेथे चुलता लक्ष्मण वाघ व त्याचे मुले उध्दव, अंकुश हे कुऱ्हाड घेवुन मारण्यासाठी आले मात्र बाबासाहेब व कृष्णा हे काहीच न बोलता तेथुन निघुन गेले. वाद वाढु नये यासाठी बाबासाहेब यांच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
दरम्यान 5 जून रोजी सायंकाळी बाबासाहेब गट नं. 22 येथील शेतात तर कृष्णा गट नं 25 मधील शेतात काम करत होते. तेंव्हा अरोपी देखील गट नं.25 येथील शेतात काम करित होते. दरम्यान आरोपी कृष्णा यांना शिवीगाळ करुन मारहाण करु लागले. आवाज आल्याने बाबासाहेब धावत गेला मात्र उद्धवने हातातील कुर्हाडीने कृष्णावर त्यांचा खून केला. बाबासाहेब वाचविण्यासाठी गेला असता आरोपी बाबासाहेबच्या दिशेने धावत आले, त्यामुळे घाबरुन बाबासाहेबने घराकडे धाव घेतली. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान तिघा आरोपींना शनिवारी (दि. 6) पहाटे गजाआड करण्यात आले तर न्यायालयाने त्याना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी दरम्यान आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कुर्हाड पोलिसांनी जप्त केली आहे. कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी काम पाहिले.