मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले – जयंत पाटील

बेळगाव ,१६एप्रिल /प्रतिनिधी 

पाच वर्षे भाजप महाराष्ट्रात सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करून आपण मराठी भाषिकांसोबत नसल्याचे त्यांनी सिद्ध झाले आहे. मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी बेळगाव इथे येऊन केले, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी बेळगावमध्ये आज पत्रकार परिषद घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच इथल्या मराठीजनांना, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शुभम शेळके यांना पाठिंबा देत असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अनेक वेळा मराठीजनांच्या हक्कासाठी या भागात आंदोलने केली आहेत. महाराष्ट्राची, मराठीजनांची एकजूट कायम रहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो, हा पाठिंबाही त्याचाच भाग असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्यात व्यस्त असतात, दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रातही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. कोरोना संकट असेल, राज्यातील बाकी मागण्या असतील त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेतली पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. मराठी लोकांचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक लढवली होती. इथल्या विधिमंडळातही समितीचे लोकप्रतिनिधी आहेत. शुभम शेळके हा तरुण मराठी माणसांचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडेल याबाबत शंका नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.