औरंगाबादचा लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची घोषणा
औरंगाबाद दि30 :बुधवारपासून जिल्हाभरात लॉकडाऊन लागणार असे घोषित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी झालेल्या लोकप्रतिनिधी सोबतच्या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा झाली.तसेच राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री , मुख्य सचिव आणि प्रधान सचिव , मदत व पुनर्वसन यांच्या सोबत झालेल्या चर्चेअंती लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री दहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पोलीस आयुकत डॉ निखिल गुप्ता हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासनासह सर्वच दिवसरात्र एक करत प्रयत्न करत आहेत. संख्या आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, परंतु लोकप्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली, यामध्ये सामान्य नागरिकांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच प्रधान सचिव , मदत व पुनर्वसन यांनी या संदर्भात विविध सूचना केल्या. शासन लवकरच कोविड19 नियमावलीबाबत सुधारित सूचना देणार आहे तदनंतर नव्याने आदेश देण्यात येणार असून त्या सूचनांचे पालन करण्यासाठी अवधी लागणार असल्याने मंगळवारी रात्री लागणारा लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या दरम्यान सध्या लागू असलेला आदेश नियमित सुरू राहणार आहे.
औरंगाबादमध्येही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.या निर्णयाचा विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही या निर्णयाचा विरोध केला होता . या निर्णयाविरोधात आम्ही 31 मार्च रोजी आंदोलन करण्याचा निर्णय खासदार जलील यांनी जाहीर केला होता. बुधवारी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.