परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागा,सर्वोच्च न्यायालयाने याचिकेत सुनावणी घेण्यास नकार

नवी दिल्ली ,२४ मार्च :प्रकरण अत्यंत गंभीर असून काही गोष्टी सार्वजनिक झाल्यामुळे काही लोकांची प्रतिमा खराब होत आहे असे मत व्यक्त करुन सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध त्यांनी याचिका दाखल केली होती. 

परम बीरसिंग यांची याचिकेवर सुनावणी सुरू होताच हायकोर्टात जाण्याऐवजी सर्वोच्च न्यायालय का आलात ? असा पहिला प्रश्न न्यायमुर्तींनी विचारला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी असे न्यायमूर्ती एस. के. के कौल म्हणाले.

परमबीर सिंग यांच्या वतीने, मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला आश्वासन दिले की, आजच मुंबई उच्च न्यायालयात अप्रोच करुन उद्या सुनावणीसाठी आदेश देण्यासाठी विनंती करु असे सांगितले.

मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन हटवणे हे बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचे परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले. अंतरिम दिलासा म्हणून आपली बदली रोखावी तसेच राज्य सरकार, केंद्र आणि सीबीआयने देशमुख यांच्या निवासस्थानचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची विनंती केली. 

उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांचा उल्लेख त्यांनी याचिकेत केला होता. सुप्रीम कोर्टाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही? अशी विचारणा केली. तसंच यावेळी त्यांनी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली. परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

का दाखल केली याचिका?

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ठाकरे सरकार टीकेचे धनी ठरले. विरोधकांकडून वाझे प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच गृह विभागाने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना पोलीस आयुक्त पदाची सूत्रं देण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.