नांदेडकरांना दिलासा,कोरोना बाधितांमध्ये नवीन व्यक्ती नाही 

दोन बाधित बरे झाल्याने दिली सुट्टी

नांदेड दि. 7 :- कोरोना बाधितांमध्ये आज नवीन एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नसून पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील दोन व्यक्ती बऱ्या झाल्याने आज रविवार 7 जून रोजी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कोरोना बाधित व्यक्तींची संख्या नियंत्रीत ठेवण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 190 बाधित व्यक्तींपैकी 131 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रविवार 7 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 32 अहवालापैकी 27 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तर उर्वरित 51 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे. उपचार घेत असलेले तीन बाधितांची प्रकृती गंभीर असून एक 65 वर्षाची स्त्री तर दोन पुरुष 65 व 74 वर्षांचे आहेत.आतापर्यंत एकूण 190 बाधितांपैकी 8 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 51 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10 बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 38, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 बाधित व्यक्तीवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. रविवार 7 जून रोजी 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 956, घेतलेले स्वॅब 4 हजार 453, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 942, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या एकही नाही, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 190, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 174, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 81, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 131, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 51, स्वॅब तपासणी चालू असलेली 59 एवढी संख्या आहे.

जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *