मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नंदा खरे, आबा महाजन यांचे अभिनंदन

मुंबई, दि. १२ : साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार पटकावल्याबद्दल लेखक नंदा खरे आणि बालसाहित्यिक बाबा महाजन यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, नंदा खरे हे त्यांच्या साहित्यातून नेहमीच एक वेगळा विचार देतात आणि वाचकांना आत्मपरीक्षणही करायला लावतात. पुरस्कारप्राप्त “उद्या” या कादंबरीत भविष्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे त्यांनी केलेले टीकात्मक विश्लेषण वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहात नाही.

मुलांची भाषा जाणणारे आबा महाजन यांनी देखील कथा, कविता या माध्यमातून मुलांचे भावविश्व अचूक रेखाटले. मी या दोन्ही साहित्यिकांचे मनापासून अभिनंदन करतो. मराठी साहित्य क्षेत्रातील नवे लेखक निश्चितच यातून  स्फूर्ती घेतील असा मला विश्वास वाटतो.