खचून जाऊ नका;केंद्राकडून मदत मिळाली पाहिजे, बळीराजाला शरद पवारांनी दिला धीर
उस्मानाबाद,दि.१८ ऑक्टोबर :राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे. ऐन कापणीला आलेली पिकं उध्वस्त झाल्यामुळं जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढं उभा राहिला आहे.
आज तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादमधील पाटोदा, करजखेडा या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी गावकऱ्यांशी संवाद साधला.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तुळजापूर जवळील काकरअंबावाडी या गावातील शेतकऱ्यांशी आज संवाद साधला व त्यांच्या नुकसानाचा आढावा घेतला.
जमीन खरवडून गेली. त्यामुळे या नुकसानाचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणी कुणाच्या विहिरी होत्या, कुणाच्या पाईपलाइन होत्या, कुणी ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. अन्य काही साधनं होती, तीदेखील वाहून गेली.या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. एकंदर नुकसानाचं स्वरूप पाहिलं तर या सर्व परिस्थितीला एकटे राज्य सरकार तोंड देऊ शकणार नाही. याठिकाणी केंद्राकडून मदत मिळाली पाहिजे. आपण आपल्या लोकप्रतिनिधींना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संबंधित प्रतिनिधींशी बोलू असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत अक्षरश: काही ठिकाणी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला घेराव गालत आपल्या समस्या त्यांच्या कानी घातल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे गावागावांतून निघालेल्या पवारांनीही शेतकऱ्यांसाठी वेळ काढत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. शिवाय झालेल्या नुकसानाचा आढावा घेत परिस्थितीवर नजर टाकली. त्यांनी जातीनं या प्रकरणात लक्ष घातल्यामुळं मदत मिळण्याबाबत बळीराजाही आशावादी असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता शरद पवार थेट पंतप्रधानांची भेट घेणार असून, किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत. तेव्हा आता या संकटानं खचून जाऊ नका असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.
अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान भरपूर आहे. त्यामुळं एकट्या राज्याला मदत देणं कठिण असल्यामुळं केंद्रानंही या बाबतीत मदतीचा हात पुढं करावा, असं पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस दौरा करत आहेत. राज्यात कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा प्रमाणात परतीच्या पावसामुळे भातशेती आणि पिके तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.