अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान

शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग – अजितदादा पवार

शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

मुंबई,८ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे ७६० हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात २६८५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. धुळे येथे ३१४४ हेक्टर, नंदूरबार येथे १५७६ हेक्टर, जळगाव येथे २१४ हेक्टर, अहमदनगर येथे ४१०० हेक्टर, बुलढाणा येथे ७७५ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ४७५ हेक्टर शेतीचे नुकसन झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग – अजितदादा पवार

अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी अडचणीत आले असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षाने सभागृहातून सभात्याग केला.

सरकारच्या वतीने सभागृहात करण्यात आलेले निवेदन अपुरे आहे. अनेक नुकसानग्रस्त भागांचा उल्लेख या निवेदनात नाही. राज्यातला शेतकरी हतबल असताना सरकारने बघू, करु अशी उत्तरे न देता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी अजितदादांनी केली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

एकीकडे शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सुलतानी संकटाचा सामना करत होता, त्यातच अवकाळी पावसाने भर घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. 

२८९ अनव्ये प्रस्ताव मांडून सभागृहात चर्चा करून सरकारला यावर उत्तर देण्यास भाग पाडावे,अशी मागणी दानवे यांनी केली.

    नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गाव शेतकऱ्याने विकायला काढला असून शेतमालाला भाव मिळत नाही. एकीकडे सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत असताना अस्मानी संकट आता मोठा घाव करत आहे, यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून पडला आहे. 

 शेतकरी छाती पेटून घेत असल्याची चित्रफीत पाहिली. नाफेडची खरेदी ही थंडावली असल्याने सरकारने या अस्मानी संकटावर चर्चा करावी. मदतीची केवळ पोकळ घोषणा न करता यावर चर्चा करावी. मागच्या वेळेस पण चार चार वेळेस राज्यात अतिवृष्टी झाली मात्र शेतकऱ्यांना मदत वेळेवर पोहोचली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी २८९ अनव्ये चर्चा घ्यायला पाहिजे होती मात्र ती घेण्यात आली नाही.  सरकार यावर काय मदत करणार आहे याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे झालेच पाहिजेत…अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.